राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त पाथरी येथे भजन स्पर्धेचे आयोजन

चंद्रपूर : आपल्या बहुमूल्य प्रबोधनात्मक भाजनातून तुकडोजी महाराजांनी देशाच्या स्वातंत्र्याची मशाल पेटविली. या पेटलेल्या ठिणगीने देशात सर्वप्रथम चिमूर स्वतंत्र झाले. यामुळेच तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंतांची उपाधी मिळाली. सोबतच आपल्या ग्रामगीतेतून राष्ट्रसंतांनी संपूर्ण राष्ट्राला मानवतेचा संदेश दिला. त्यांनी राष्ट्राला दिलेली शिकवण मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून सेवा हाच खरा धर्म आहे तो जपायला हवा असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी केले ते पाथरी येथे गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य भजन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

गुरुदेव सेवा मंडळ पाथरी च्या वतीने आयोजित भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस जेष्ठ नेते चंद्रशेखर चन्ने, माजी सरपंच राजेश सिद्धम, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, सावली प. स.चे माजी सभापती विजय कोरेवार , रजनीकांत मोटघरे, गुरूदेव सेवा मंडळ चे जेष्ठ गोपालकृष्णजी ठीकरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, संजय पुप रेड्डीवार, बालाजी ठिकरे, दिलीप ठीकरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री वडेट्टीवार म्हणाली की, कुठलाही उत्सव हा मजा करण्याचा उत्सव नसून त्यातून प्रबोधनाचा ध्यास घेणे गरजेचे आहे. राष्ट्रसंतांनी आपल्या शिकवणीत गावाच्या प्रगतीसाठी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले आहे. श्री गुरुदेव यांनी म्हटले की गाव-गावाशी जागवा, मतभेद सारे मिटवा, पेटवा ग्रामउन्नतीचा दिवा, तुकड्यादास कहे अशा कल्याणकारी महत्वपूर्ण मार्ग त्यांनी ग्रामगीतेतून मानव जातीला दाखविला. मानवता हाच खरा धर्म असून मानव सेवा हीच खरी सेवा असल्याचे महत्त्व राष्ट्रसंतांनी पटवून दिले. यावेळी माजी मंत्री वडेट्टीवार यांनी पात्री येथे शुद्ध पेयजल योजनेसाठी 17 कोटी रुपये मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. तसेच तालुक्यात आज पावतो दीडशेहून अधिक कर्करोग ग्रस्त रुग्णांना मदत करून येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कर्करोग निदान अत्याधुनिक यंत्र असलेल्या वाहनाने संपूर्ण मतदारसंघात कर्करोगाची निदान करून लोकांना प्राणघातच असलेल्या कर्करोगाच्या बचावासाठी प्रयत्न करणार असल्याची ही ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

यानंतर भजन स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुरुष गट व महिला गट यांना रोख पारितोषिक तसेच चषक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा मंडळ पाथरीचे अध्यक्ष रमेश ठीकरे, ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहित मेश्राम, अमित ठीकरे, मारुती ठीकरे रोशन ठीकरे, खुशाल ठीकरे, संतोष उंदीरवाडे, अनुप वालदे, राकेश कोहळ, सचिन शेंडे यांनी अथक परिश्रम घेतले.